▪अन् घाशीराम कोतवाल जर्मनीत पोहोचला
ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आणि डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक जोरदार गाजलं. ८०च्या दशकात या नाटकाचा प्रयोग जर्मनीत होणार होता. पण या नाटकाला काहींचा विरोध होता.
नाटकात काम करणारी अनेक मंडळी पुण्यात राहत होती. जर्मनीला विमानाने जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणं आवश्यक होतं.
विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ गाड्या अडवण्याची योजना आखली. पण ही माहिती अगोदर नाटकातील मंडळीना कळल्यामुळे डॉ. जब्बार पटेल आणि डॉ मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली.किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते. पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब ‘घाशीराम कोतवाल’च्या टीमसाठी पुणे-मुंबई चार्टर विमानाची सोय केली.
▪पवार जेव्हा पूजा करतात
मी विज्ञानवादी आहे, असं म्हणणाऱ्या शरद पवारांना जाहीरपणे पूजा-आरत्या करताना कुणी फारसं पाहिलं नाही. पण मुख्यमंत्री असताना त्यांनी सपत्निक विठ्ठल-रखुमाईची पूजा केली होती.अनेकदा जाहीरपणे देव-धर्माबद्दल चिकित्सकपणे पवार बोलतात. पण तेच पवार आग्रहास्तव पूजाअर्चाही करतात. भीमाशंकरच्या गेस्टहाऊसमध्ये रात्री झोपलेले असताना पवारांच्या अंगावरून साप गेला. पण त्यांना काहीही इजा झाली नाही. त्यानंतर पत्नी प्रतिभाताई या भीमाशंकरच्या मंदिरात नवस बोलल्या आणि त्यांच्या आग्रहास्तव शरद पवारांनी भीमाशंकरला अभिषेक घातला होता, असं पत्रकार संजय मिस्कीन सांगतात.पवारांच्या गावी म्हणजे काटेवाडीत हनुमानाचं मंदिर आहे, तिथेही गावकऱ्यांच्या आग्रहास्तव अनेक वर्षं ते अभिषेक करत होते.
▪’पुतना मावशी’ची माफी
शरद पवार १९८७ साली पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि १९८८ साली ते महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या २८५ भूखंडांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण खूप गाजलं.हे भूखंड खाल्ल्याचा आरोप थेट शरद पवारांवर होता. जनता दलाच्या नेत्या मृणाल गोरे आणि शिवसेनेचे त्यावेळचे आमदार छगन भुजबळ यांनी पवारांवर हा आरोप केला होता. भूखंडाची आरक्षणं कशी वाटली गेली आणि बदलली गेली, याविषयी पवारांनी जाहीरपणे खुलासा केला नव्हता.
मृणाल गोरे यांनी भूखंड घोटाळ्याविषयी विधानसभेत आरोप केला, तेव्हा शरद पवार यांनी संतापून त्यांना ‘पुतना मावशी’ असं म्हटलं. पण नंतर पवारांनी मृणाल गोरेंची माफीही मागितली. या घोटाळ्यावरचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.

▪लेक माझी लाडकी!
शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी लग्नानंतर एकच मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला होता. १९६९ ला त्यांना मुलगी झाली. खरंतर त्या काळात ‘मुलगा हवाच’ अशी समाजाची कर्मठ मानसिकता होती.पण जवळपास पाच दशकांपूर्वी पवारांचा हा निर्णय काळाच्या पुढचा होता. आजही कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया बहुतांश महिलाच करतात. पण शरद पवारांनी स्वत: नसबंदी करत आदर्श घालून दिला.
▪ आयपीएलचे जनक
टी -२० स्पर्धा भारतात होऊ शकते, असं बीसीसीआयचे अध्यक्ष असताना शरद पवारांना वाटलं. त्यासाठी त्यांनी ललित मोदींना प्रोत्साहन दिलं.भारतामध्ये आयपीएल सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल, असं रवी शास्त्री यांनी दिलीप सरदेसाई स्मृती व्याख्यानात म्हटलं होतं. आयपीएल सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले, पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं, तर हे केवळ अशक्य होतं, असं शास्त्री म्हणाले. शरद पवार हे २००५ ते २००८ या काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते.

आयपीएल संदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलींचा गठ्ठा घेऊन येत असत. त्यातील प्रत्येक पान त्यांनी वाचलेलं असे. त्यांचा अभ्यास पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचं निरीक्षण हे सूक्ष्म आणि दृष्टी व्यापक असल्यामुळेच भारतात आयपीएल सुरू झालं’ असं रवी शास्त्री यांनी या व्याख्यानात म्हटलं होतं.

from https://ift.tt/3EJEB6m

By News

Leave a Reply

Your email address will not be published.