
अध्यात्म आम्हाला काय देते?मोठा क्लिष्ट प्रश्न आहे.कारण तो प्रश्न झाला हीच मोठी शोकांतिका आहे.परमार्थाची गरज मनुष्य जातीला सतत लागणार आहे हे जाणुनच संतांनी ग्रंथ लिहिले.परमार्थ मानवी मुल्यांची जोपासना करण्यासाठी सिद्ध आहे.पुंडलिक त्याची साक्ष आहे.मातृपितृ सेवेने देवालाही तिष्ठत ठेवणारा पुंडलिक आहे.
हरीगजर होताना हरीच्याही आधी पुंडलिकाचा जयघोष होतो.पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम….हा जयघोष आम्ही अनंतवेळा केला असेल पण बोध होतोच असं नाही. भगवंतालाही मातृपितृ भक्त किती प्रिय आहे याचाच हा पुरावा आहे. भगवान परमात्मा पुंडलिकाच्या मातृपितृ सेवेने प्रसन्न झाले. त्याला दर्शन देण्यासाठी ते प्रगट झाले पण पुंडलिक आईवडिलांच्या सेवेत व्यस्त होता.त्याची ती सेवा कौतुकाने पहात रहाण्याचा मोह भगवंताला झाला.
हा हरीगजर ज्याला कळेल तो मनोभावे आईवडीलांची सेवा करील.पुंडलिकाला भगवंत म्हणाले,मी प्रसन्न झालो आहे, माग काय मागायचं.तेव्हा पुंडलिकाने काय मागितलं?
तुकोबाराय म्हणतात,
पंढरीचे वारकरी।ते अधिकारी मोक्षाचे।।
पुंडलिका दिला वर।करुणाकरे विठ्ठले।।
मुढ पापी जैसे।उतरी कासे लावूनि।।
तुका म्हणे खरे जालें।एका बोले संतांच्या।।
पंढरीची वारी त्यासाठी करायची आहे. चुका सुधारुन मोक्षाधिकार देणारं पंढरपूर क्षेत्र आहे. आईवडिलांची सेवा करणारांनावर विठ्ठलकृपा होतेच.ही कृपा आमच्यावर देवाने करावी यासाठी पुंडलिक म्हणाला,नच जावे देवा माझे गावाहुनी।.. युगे अठ्ठावीस तो उभा आहे.पण त्याच्या दर्शनाची चावी आईवडीलांच्या चरणाजवळ आहे. ती मिळवता येणे म्हणजे परमार्थ आहे.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3dXxKKR