
मुंबई : कलाबेन डेलकर यांच्या विजयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत हे दिल्लीत धडका मारायची भाषा करीत आहेत. परंतु कलाबेन डेलकर शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या नाहीत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यामुळे उद्या त्या भाजपमध्येही येऊ शकतात, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला.
दादरा नगर-हवेलीमध्ये यापूर्वी मोहन डेलकर सातवेळा निवडून आले होते. आता त्यांची पत्नी निवडून आली. यामध्ये शिवसेनेचा कोणताही वाटा नाही, असे नारायण राणे म्हणालेत. तिथे शिवसेनेचा साधा शाखाप्रमुखही नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे नाचत आहे. काही काळाने कलाबेन डेलकर भाजपमध्ये येतील तेव्हा शिवसेनेने बोंबलत बसू नये, असेही नारायण राणे यांनी म्हटलंय. आम्ही 303 पेक्षा अधिक आहे. तुम्ही एकने धडक मारणार. दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही. संजय राऊत डोक्याविना दिसतील. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच, अशी बोचरी टीकाही त्यांंनी केली.
डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या. लिखाण करताना त्यांना भान राहत नाही, असे राणे म्हणाले.
रात्री जे करायचे ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं, असे म्हणत राणेंनी राऊतांवर सडकून टीका केली आहे.
नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शिवसेनेचे 56 आमदार आणि 18 खासदार निवडून आले. पुढच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढल्यास इतके आमदार-खासदार निवडून येणार नाहीत, असे नारायण राणे यांनी म्हटले भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री झाला नाही. आज ढिंडवडे निघतायत. काय बोलताय, काय करताय?, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री बारामतीला गेले. त्यावेळी शेतकरी प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन त्यावर बोलावं. काहीच बोलले नाही. नुसती टिंगल टवाळी, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, शरद पवारांसारखा लाचारपणा आमच्या रक्तात नाही. त्यानंतर त्याच शरद पवारांकडे लाचार होऊन जाऊन मुख्यमंत्री पद स्विकारले, असा घणाघात राणेंनी केला.
from Parner Darshan https://ift.tt/3qe1QB4