
चित्तात सतत प्रदर्शन सुरू आहे. आंतरिक दृष्टीने ते आपण सतत पहात असतो.यावरून आपल्याला आंतरिक दृष्टी आहे हे स्मरण होईल. ज्या डोळ्यांनी आज आपण जग पहातो ते डोळे सत्य दाखवित नाहीत हे हळूहळू समजु लागेल.त्यासाठी चित्तात श्रद्धेची मुर्ती स्थापण होणे अत्यावश्यक आहे.आपली ज्या कुणावर श्रद्धा असेल ती मुर्तीरुपाने चित्तात निश्चित करायची आहे. कारण चित्त रिकामे रहात नाही. तेथे सतत उर्जा पोहोचत असल्याने बरेवाईट चलचित्र सतत चालू रहाणार.
आपलं मन त्यासाठी सामुग्री पुरवत असते.चित्तात मनोलय झाला की स्थिती पाहता पाहता बदलत जाईल.चित्तात इतर काही दिसेनासे झाले की चित्तशक्ती क्षीण होत जाईल. उड्या मारणाऱ्या मनालाही चित्तात स्थापन केलेल्या मनोमुर्तीची गोडी लागेल.त्याचं भटकणं हळूहळू कमी होईल. चित्तात मनाचं सात्विक मिलन होणं म्हणजे मनोलय होणं आहे.
या सत्परायण आवस्थेसाठी ही धारणा आहे. मगच ध्यान सुरू होऊ शकेल.रिकाम्या ध्यानाने मन जागेवर बसुच देणार नाही. ध्यानासाठी धारणा आवश्यक आहे. ध्यान कुणाचं करायचं?असा प्रश्न मन वारंवार विचारणार आहे. आपण प्रवासाला निघालो की कुठे जायचे हे जसे अगोदरच निश्चित झालेले असते तसे ध्यान कुणाचे करायचे हे अगोदर निश्चित झाले पाहिजे.त्यालाच धारणा म्हणतात. धारण करण्यायोग्य म्हणजे धारणा.
धारणा काय असावी?अस्तिक,नास्तिकालाही आत्मशांतीकडे घेऊन जाणारा हा एकच मार्ग असल्याने दोन्ही अंगाने हा विषय आपण हताळणार आहोत.त्यामुळे धारणेची पद्धत बदलणार आहे. ध्यान एकच आहे.ध्यान अनेक प्रकाराने करता येत असले तरी मुक्कामाचे ठिकाण एकच आहे हे लक्षात घ्यावे.धारणा निश्चितीनंतरच ध्यानाला बसता येईल. त्याशिवाय केलेलं ध्यान म्हणजे संसाराचं सिंहावलोकन होईल. मुर्तीशिवाय मंदिर असेल तर दर्शन कुणाचं घ्यायचं? हा प्रश्न पडणारच.म्हणूनच आधी मुर्ती स्थापना,पण चित्तमंदिरात बरका.त्याचा विचार आपण पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/pHPIba4QG