
बिजनौर : उत्तर प्रदेश मध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी प्रत्येक पक्षाकडून विकासकामाचा आढावा घेतला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच एका आमदारांना रस्त्याच्या उद्घाटनासाठी बोलविण्यात आले होते. सात किलोमीटरचा रस्ता 1.16 कोटी रुपयांत तयार झाला होता. आमदारांनी रस्त्याच्या उद्घटनासाठी नारळ फोडला… पण नारळ काही फुटला नाही. उलट रस्त्याला खड्डा पडला आणि खडी बाहेर आली. या प्रकाराने संतप्त झालेल्या आमदारांनी लोकार्पण करण्याचा कार्यक्रम टाळला.
या घटनेमुळे उत्तरप्रदेशमधील सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये हा प्रकार घडलाय. उद्घाटनासाठी आलेल्या आमदार सुची मौसम चौधरी यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी करून आंदोलन केले. रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आणि रस्त्यात निकृष्ट साहित्य वापरण्यात आल्याचा सुची चौधरी यांनी आरोप केला.
पाटबंधारे विभागाने 1.16 कोटी रुपये खर्चून करुन 7.5 किमी लांबीचा रस्ता तयार केला आहे. मला रस्त्याचे उद्घाटन करमण्य़ासाठी बोलवण्यात आलं होतं. मी तिथे जाऊन नारळ फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नारळ फुटला नाही. पण रस्त्याला खड्डा पडला, असं आमदार सुची चौधरी यांनी उपस्थित असणाऱ्या पत्रकारांना सांगितलं. रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आलेला असू शकतो, असेही चौधरी यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकारानंतर उपस्थित लोकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लोकांनी रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर केल्याचा आरोप करत आंदोलन केलं. यावेळी आमदारही लोकांसोबत आंदोलनाला बसले होते. त्यानंतर काही वेळानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचले आणि चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
from https://ift.tt/3EpD19I