नगर : तालुक्यातील 3 ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या जुलै महिन्यात प्रशासकीय बदल्या झाल्या.पण अद्यापही ते नियुक्तीच्या ठिकाणी हजर झालेले नाहीत. तसेच तालुक्यातील सहा ग्रामसेवकही नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता दुसऱ्याच गावात काम करत आहेत. या सर्वांना आतापर्यंत 7 वेळा नोटीस देण्यात आलेल्या आहेत पण त्याची दखलही न घेता त्या नोटीसीना केराची टोपली दाखवली आहे.हे लोक प्रशासनासाठी डोकेदुखी बनले आहेत.
नगर तालुक्यातील काही ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक प्रशासनाला डोईजड झाले आहेत.ते त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता स्वतः च्या सोयीच्या गावात काम करत आहेत.जेऊर,अकोळनेर, निंबळक या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या जुलै 2021 मध्ये प्रशासकीय बदल्या झाल्या. ऑनलाइन बदल्या प्रक्रियेमध्ये या लोकांनी स्वतः निवडलेली गावे त्यांना देण्यात आली .तसे नियुक्ती आदेशही त्यांनी स्वीकारले पण 7 महिन्यानंतरही त्यांनी आपली मूळ गावे सोडलेली नाहीत आणि नवीन नियुक्ती च्या ठिकाणी हजर नाहीत.
अशीच अवस्था तालुक्यातील शिंगवे नाईक, शहापूर- केकती, अरणगाव, टाकळी काझी, उक्कडगाव, सारोळा कासार येथील ग्रामसेवकांचीही आहे. येथील ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता इतर सोईच्या ठिकाणी काम करत आहेत. शिंगवे नाईक मूळ सजा असणारे ग्रामसेवक खोसपुरी येथे काम करत आहेत.शहापूर केकतीचे ग्रामसेवक शिंगवे नाईकला काम करत आहेत.अरणगावचे ग्रामसेवक सारोळा कासारला काम करत आहेत.टाकळी काझीचे ग्रामसेवक निंबळकला काम करत आहेत.उक्कडगाव मूळ सजा असणारे ग्रामसेवक हातवळनला काम करत आहेत.सारोळा कासार चे ग्रामसेवक बुरुडगावला काम करत आहेत.तसेच जेऊर मूळ सजा असणारे ग्रामविकास अधिकारी अकोलनेरला काम करत आहेत.निंबळक मूळ सजा असणारे ग्रामविकास अधिकारी जेऊरला काम करत आहेत.
या सर्वांना नगर पंचायत समितीने आजपर्यंत 7 वेळा नोटीस ही दिल्या आहेत पण या सर्वांनी नगर पंचायत समितीच्या नोटीसीना केराची टोपली दाखवत अद्यापही नियुक्तीच्या गावी हजर न होता स्वतः हव्या त्या गावातच काम करत आहेत. यावरून नगर पंचायत समितीचा कारभार हा लोकप्रतिनिधी नव्हे तर अधिकारी आपल्या मर्जीनुसार चालवतात हे दिसून येते.यापुढे आमच्या बदल्या कोणत्याही गावी झाल्या तरी आम्ही आम्हला सोईच्या गावातच काम करू असे अनेक ग्रामसेवक खाजगी मध्ये बोलत आहेत.

नगर पंचायत समितीने या ग्रामसेवकाना आता पर्यंत 7 वेळा नोटीस दिल्या आहेत.तरीही हे अधिकारी नियुक्तीच्या गावी हजर नाहीत.उलट या अधिकाऱ्यांनी आमदार निलेश लंके, माजी आमदार शिवाजी कर्डीले, शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, यांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या असून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे कार्यकर्त्यांकडून लॉबिंग केली आहे. प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी पूर्ण लॉबिंग केली जात आहे.
नियुक्ती च्या ठिकाणीच कार्यभार सांभाळणे हे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावर बंधनकारक आहे.आजपर्यंत 7 नोटीस दिल्या आहेत.पण त्याचे पालन झालेले नाही. गटविकास अधिकारी यांनी आता निलंबनाची कार्यवाही करावी. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
सुरेखा गुंड (सभापती)
डॉ.दिलीप पवार (उपसभापती ) नगर पंचायत समिती

from https://ift.tt/3GTuEnt

By News

Leave a Reply

Your email address will not be published.