बीडः सततचा दुष्काळ अन अवकाळी अतिवृष्टी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाचवीलाचं पूजलेलं आहे. यामुळं इथला शेतकरी नेहमी अस्मानी संकटात पिचला जात आहे. मात्र, या नेहमीच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एका शेतकऱ्याने अजबच नाद केलाय. तब्बल दीड एकर शेतामध्ये २ कोटी रुपये खर्च करून विहीर खोदली आहे. यामुळे आता ३-४ वर्ष जरी पाऊस झाला नाही तरी जवळपास ५० एकरवर शेती बागायती होऊ शकते. पाहुयात दुष्काळी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रात सर्वांत मोठी विहीर म्हणून नोंद ठरु शकणाऱ्या, नाद खुळ्या शेतकऱ्याच्या विहिरीची अजब गोष्ट !
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या पाडळसिंगी गावचे शेतकरी मारूती बजगुडे यांनी ही विहीर बनवली आहे. शेतकरी मारूती बजगुडे यांना १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल अशी काही तरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादीत पाणीसाठा राहतो त्यामुळे त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर तयार करण्याचे ठरविले.
मात्र, सुरूवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या. परंतु त्यावर यशस्वीपणे मात करत मारुती बजगुडे यांनी तीन वर्षांपूर्वी ही विहीर खोदण्यासाठी सुरूवात केली होती. सुरूवातीला या विहीरीतून निघालेला मुरूम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना १५ ते २० लाख रूपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही. हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू केले. खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून दररोज ८० मजूर यासाठी काम करीत होते. तर १० हायवा यातील माती व दगड काढण्यासाठी लावण्यात आल्या होत्या. अखेर ही विहीर पूर्ण झाली असून या विहीरीसाठी जवळपास दोन कोटींचा खर्च झाल्याचे बजगुडे यांनी सांगीतले.
या अवाढव्य विहीरीत १० कोटी लिटर पाणी साठण्याची क्षमता आहे. लांबून पाहील्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. अशा प्रकारची ही विहीर असून महाराष्ट्रात ती एकमेव ठरण्याची शक्यता आहे. मारूतीराव बजगुडे यांना असलेल्या १२ एकर शेतीपैकी ८ एकरमध्ये त्यांनी मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहीरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. तसेच या विहीरीमुळे भविष्यातील शेतीच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
तर या विहिरीची माहिती मिळाल्याने, विहीर पाहण्यासाठी नागरिक येत आहेत. गाव परिसरासह बीड, गेवराई यासह अनेक ठिकाणाहून ही विहीर पाण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिक येत आहेत. तर विहीर पाहून अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरत नाही. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील मारुती बजगुडे यांचा आदर्श घ्यावा आणि आठ-दहा शेतकऱ्यांमध्ये अशी विहीर खोदावी, जेणेकरून बीड जिल्हा दुष्काळ मुक्त होईल. अशी प्रतिक्रिया पाहण्यासाठी आलेल्या गोवर्धन मांडे यांनी दिली आहे
दरम्यान, बीड जिल्ह्यात कधी अस्मानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतात होत्याचं नव्हतं होतं, त्यामुळे सततच्या दुष्काळावर तोडगा काढताना मारूती बजगुडे या शेतकऱ्यांने तब्बल दोन कोटींची दीड एकर शेतामध्ये विहीर खोदली आहे. त्यामुळे आता ही विहीर बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली असून महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या स्वरूपाची ही पहिलीचं विहीर असण्याची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी “मारूती बजगुडे यांनी नाद केला पण वाया नाही गेला” असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

from https://ift.tt/cDgAv5T

By News

Leave a Reply

Your email address will not be published.