पारनेर : ज्ञानोबा तुकारामांच्या नावाने अनादी कालापासून सुरू असलेला वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर एकमेव असून याची भूरळ आता यूरोपियन देशांनाही पडली असल्याचे प्रतिपादन राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष ,पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
तालुक्यातील सारोळा अडवाई येथील सद्गुरु वै. रामदास खोडदे बाबा यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सात कोटी नामजप सप्ताहाचा शुभारंभ श्री. पोपटराव पवार,राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके, शिवाजी महाराज लामखडे, साहेबराव महाराज जाधव, पंढरीनाथ महाराज महाराज आदी. या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पद्मश्री पवार म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आल्यानंतर युरोपियन देशांनाही वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटले असून या संप्रदायाची ताकद समजून घेण्यासाठी हे देश सरसावले आहेत असे सांगत पद्मश्री पवार म्हणाले की, वारकरी संप्रदायाचे साम्राज्य संपूर्ण जगभर पसरले आहे.या संप्रदाय शिवाय मानसिक स्वास्थ्य लाभत नाही याची जाणीव इतर देशांनाही झाली असून कोरोनाच्या संकटात हतबल झालेल्या देशांनी मनःशांतीसाठी वारकरी संप्रदायाचा वारसा स्वीकारण्याची तयारी दर्शविली असल्याचेही पद्मश्री पवार यांनी सांगितले.
प्रतिकूल जीवनाला अनुकूल करण्याची ताकद संतांच्या संस्कारात असल्याने संत सहवास महत्त्वाचा असल्याचे बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सांगितले. पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सारोळा अडवाईचे सरपंच परशुराम फंड व सेवा संस्थेचे अध्यक्ष बबनराव फंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ‘पारनेर दर्शन’चे संपादक देविदास आबूज यांनी केले.
यावेळी योगेश महाराज शिंदे, प्रकाशशेठ म्हस्के, बाळासाहेब आंबेकर, रमेश आबूज,रंगनाथ रोहोकले, किसनराव आबूज,डॉ. दत्तात्रय महांडूळे, शंकरराव महांडूळे आदी भाविक भक्त उपस्थित होते

from https://ift.tt/VgdsD2n

By News

Leave a Reply

Your email address will not be published.