
मुंबई : संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा प्रवाशांचाही विचार करावा. एसटीच्या संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. पण काहींनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला. सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज पसरवला गेला. मला येथे राजकारण करायचे नाही. मला प्रश्न सोडवायचे आहे. ज्यांना राजकारण करायचे, त्यांनी जरूर राजकारण करावे, माझ्या दृष्टीने हा प्रश्न सोडविणे जास्त महत्त्वाचे आहे. काहींना याबाबत गैरसमज पसरवले आहेत. मात्र ज्यांनी दिशाभूल केली त्यामुळेच हा संप चिघळला गेला, सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.
एस.टी कामगारांच्या एकूण 22 संघटनांच्या कृती समितीची शरद पवारांसोबत बैठक झाली. परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना कामावर तत्काळ रुजू होण्याचे आवाहन केले. प्रतिनिधींचे बोलून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी खा.शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काही लोकांनी गैरसमज पसरवल्यामुळे हा संप इतका लांबला गेला, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान एस.टी कर्मचाऱ्यांबाबत आज सरकार इतक सकारात्मक का झालं ?, यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकार एसटी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे. पण एसटी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार नाही. एसटी रस्त्यावर धावली पाहिजे. पगारवाढ, विलीनीकरन यावरही खा.शरद पवार यांनी महत्त्वाची वक्तव्य केली. एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही, असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, यावेळी एसटी कामगार संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेतून निश्चित तोडगा निघेल आणि सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे सगळे प्रश्न चर्चेतून सोडवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
एसटी चालू झाली पाहिजे, असा आग्रह यावेळी बैठकीत सगळ्यांनी मांडला. दरम्यान, एसटी संपामुळे दोन महिने प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होऊन त्यांच्यावरील कारवाईबाबतचा लढा द्यायला हवा होता, त्यातून निश्चितच मार्गही निघाला असता, असेही पवारांनी यावेळी म्हटले आहे.
from https://ift.tt/3GvkiL3