तुकोबारायांनी गाथा आपला माथा ठिकाणावर येण्यासाठीच लिहला आहे. आपण नेमकं कसं वागावं?कसं वागु नये,याचं इत्यंभूत आणि अचुक मार्गदर्शन त्यांनी केलं आहे.आपल्याला त्याची गरज वाटत नाही हेच आपलं दुर्दैव आहे. मुळात आयुष्य तरी किती आहे?यावर फार बोलाण्याची गरज वाटत नाही कारण आयुष्य सोडून सगळं आम्ही व्यवहाराशी जोडायला तयार आहोत.वयाच्या ढोबळ आकडेवारीतच आम्ही धन्यता मानतो. पण खरंच आपल्या आयुष्याइतके आपण जगलो आहोत का?हा काय प्रश्न आहे का?वय आहे तेवढं आम्ही जगलोच आहोत,असं ठासून सांगु आम्ही. पण ते अजिबात खरं नाही. कारण तुकोबारायच तसं म्हणतात,

अल्प आयुष्य मानवी देह।
शत गणिले ते अर्ध रात्र खाय।
मध्ये बालत्व पिडा रोग क्षय।
काय भजनासि उरले ते पाहे गा।।२
आयुष्य अल्प आहे. कारण अर्ध आयुष्य झोपण्यात जाते.बालपण अज्ञानात जाते.आणि वयपरत्वे पुढे व्याधीने जर्जर होऊन शरीर सुधारण्यात आयुष्य निघुन जाते.मग हरिचा आठव करायचा म्हटलं तरी किती आयुष्य शिल्लक आहे?असा प्रश्न तुकोबारायांनी विचारला आहे. ते पुढे म्हणतात,

क्षणभंगुर नाही भरवसा।
व्हा रे सावध सोडा माया आशा।
न चळे बळ पडेल मग फासा।
पुढे हुषार आहे थोर ओळसा गा।।३
असा हा क्षणभंगुर असलेला बेभरवशाचा देह आहे.म्हणुन वेळीच सावध झाले पाहिजे. एकदा का काळरुपी फासा पडला की मग आपले बळ चालच नाही की हुशारी चालत नाही.शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर महाराज म्हणतात,
काही थोडा बहुत पाठलाग।
करा भक्तिभाव धरा बळकट।
तन मन ध्यान लावुनिया निट।
जर असेल करणे गोड शेवट गा।।४
सज्जनहो आयुष्यात आयुष्याचं गणित समजल्याशिवाय ते सोडवता येत नाही. मात्र संतांच्या मार्गदर्शनात जीवनाचं अवघड गणित सोपं करण्याची शक्ती आहे, पण त्यासाठी भक्तिमार्ग आवश्यक आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/mC6W1iZ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.