प्राणमय कोश समजून घेताना मुख्य गोष्ट प्राण आहे. म्हणजे जीवंत रहाण्यासाठी प्राणाचं अस्तित्व टिकणं महत्त्वाचं आहे. पंचमहाभुतातल्या वायुंचं नियमन योग्य तऱ्हेने व्हायला हवं. खरं तर ते नैसर्गिक रित्या होतच असतं.पण आपल़ जगणं बेगडी होत चालल्याने शरीर रोगी होऊन दुःख वाट्याला येत आहे.मागच्या भागात आपण अन्नमय कोशाचा विचार केला.आपण जर खाण्यावर ताबा मिळवायचा ठरवलं असेल तर नक्कीच पोटात थोडी भुक नेहमी शिल्लक रहाणार आहे. ही रिकामी जागा म्हणजे आयुष्य पुर्णपणे जगण्याची व्यवस्था आहे असं समजा.
श्वासोच्छ्वास म्हणजे शरीर चालण्यासाठी लागणारं वायुइंधन आहे.वाहन चालण्यासाठी डीझल,पेट्रोल सोबत हवेचं मिश्रण जसं गरजेचं असतं,एअर फिल्टर खराब झाला तर गाडी झटके मारायला सुरुवात करते हे आपण अनुभवले असेलच.यावरुन ही कल्पना नक्कीच आली असेल की नुसत्या इंधनाने वाहन चालत नाही. त्यासाठी योग्य हवेचं मिश्रण लागतच.
बेसुमार खाण्याची सवय शरीरातील वायुसंतुलन बिघडवते.आता अन्नमयकोशावर परत बोलण्याची गरज नाही. आपण आपली श्वासगती कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे,पण कोणतीही अघोरी पद्धत वापरायची नाही. श्वासाशी खेळ म्हणजे मृत्युशी गाठ हे लक्षात ठेवा.
ध्यानधारणेची बैठक अनेकांनी सुरू केली असल्याचे अनेक फोन मला येत आहेत.प्राणमय कोश समजण्यासाठी ध्यानधारणा हेच मुख्य तंत्र आहे.सारं लक्ष श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आतल्या कानांनी हा श्वास ऐकायचा आहे.किमान शंभर दिवस हेच करायचं आहे. त्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की श्वासाची लांबी वाढली आहे. शंभर दिवसांपूर्वी तुमची प्रतिमिनिट असलेली श्वासगती मंदावली आहे. मग जाणिवपूर्वक ध्यानसाधनेत हळूहळू मोठे श्वास घेण्याची सवय लावायची आहे.
श्वास रोखण्याचे तंत्र अवगत नसताना श्वास रोखू नये. समर्थ मार्गदर्शकाशिवाय श्वास रोखण्याची म्हणजे कुंभक करण्याची चुक करु नये.केवळ मोठे श्वास घेण्याने शरीरात नेहमीपेक्षा जास्त ऑक्सिजन जाणार आहे. शिवाय प्रत्येक धमनीअस्तापर्यंत तोसहज पोहोचणार आहे. श्वास ऐकण्याची सवय लागली की मन शुन्य व्हायला सुरुवात होते.(अध्यात्मिक क्षेत्रात नामचिंतन ही खूप सोपी प्रक्रिया आहे.सदगुरुंचं मार्गदर्शन मिळालं की कृपा होतेच.)आपण हे चिंतन आस्तिक नास्तिकालाही पुरक वाटावे याची दक्षता घेऊन करत आहोत हे नामधारकांनी लक्षात घ्यावे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/ym9VR4g

By News

Leave a Reply

Your email address will not be published.