आपण आजारी पडलो की बरे होण्यासाठी प्रयत्न करतो.दवा डॉक्टर करतो आणि बरे होतो.पण लवकर बरे होता आले नाही की मग मृत्युभय तयार होते.एकदा का मृत्युजाप झाला की मग त्याला जीवनदान मिळणं मोठं कठीण होतं.
एक मजेने प्रश्न आला आहे, की ध्यानधारणेने मृत्युला हुलकावणी देता येते का? किमान लांबवता येईल का? हा प्रश्न आपल्याला खूप काही ज्ञान देणार आहे.

ध्यानसाधनेत पडणाऱ्या प्रश्नांचा विचार आणि उत्तरापर्यंत जाता आले नाही तर सगळं व्यर्थ आहे. मृत्यू का महत्त्वाचा आहे हे आधी समजून घेतले पाहिजे.
अमरत्वासारखा शाप दुसरा कोणताही नाही. अर्थात ब्रम्हांड रचना तेवढी शक्तिशाली आहेच.विचार करा काही योग प्रक्रिया करून अमर होता आलं तर शंभरी ओलांडेपर्यंत आनंद टिकुन राहिल.पण जसं जसं आयुष्य पुढे जाईल तसं तसं आपल्या भोवतालची माणसं मरत जातील आणि नवी पिढी तयार होईल. मग अजुन पुढे मृत्यू, जन्म, मृत्यू, जन्म सतत सुरू राहिल.तुम्हाला जाणणारं कुणीही रहाणार नाही. नात्यांमधलं अंतर वाढत जाईल.हे आमचे खापर पंजोबा,ढोपर पंजोबा अशी ओळख तुम्हाला काय देईल?
फक्त आणि फक्त दुःख. अमरत्व मिळाल्यावर मरताही येणार नाही. मग हा शापच ठरेल की नाही?म्हणून मरण येणं हे हितावह आहे. आता ते केव्हा येईल हे आपल्या हातात नसलं तरी ते लवकर येण्यासाठी आमची तयारी सुरु आहे. व्यसनाधीन होऊन लवकर मरण सहज आहे. नको त्या भानगडी करून जीवन धोक्यात घालणारेही आपण पहातो.
ध्यानसाधनेने मिळालेलं जीवन आनंदी करणे शक्य आहे. जगण्याचं तंत्र स्वतःच स्वतःकडून शिकण्याची कला ध्यानसाधना शिकवते.या साधनेतुन मृत्यू चुकवता येणार नाही, तो लांबवताही येणार नाही. पण जेवढे जीवन मिळाले आहे ते भरभरून जगता येईल.मिळालेलं जीवन पर्याप्त आहे. पण नको त्यात लक्ष घालण्याच्या जन्मजात सवयीने आयुष्य पुरत नाही हे खरे आहे. जगण्याचं नियोजन करता आलं की मग आयुष्य भरपूर मिळाल्याचा आनंद होतो.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/UenrWtJ

By News

Leave a Reply

Your email address will not be published.